- गाय,शेळ्या,मोर, कुत्र्यांचा मृत्यू
- विषप्रयोग असल्याची तक्रार
हनुमानटेकडी,बौद्ध लेणी परिसरातील हिरवळ पशू-पक्ष्यांसाठी मृत्यूची खाई बनली आहे. कुणा अज्ञात माथेफिरूने या परिसरात जहरी कीटक नाशक मिश्रीत अन्न ठेवले आणि ते खाल्ल्यामुळेच गाय, शेळ्या, कुत्र्यांबरोबरच राष्ट्रीय पक्षी असलेले मोर सुद्धा मरत आहेत, अशी तक्रार भन्ते सत्यदीपजी यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना शोधून काढून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पक्षी मित्र दिलीप यार्दी यांनी केली आहे.
शहरातील हनुमान टेकडी,विद्यापीठ, बौद्ध लेणी हा भाग डोंगर आणि हिरवळीने नटलेले आहे.या डोंगरामधील वनराईत अनेक जातीच्या पशु-पक्षी येत असतात मात्र मागील अनेक दिवसांपासून या वनराईत अनेक पशु-पक्षी मरण पावत आहेत. स्थानिक राहिवाशांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांसह जंगलात पाहणी केली असता थायमेंट नावाचे किटकनाशक गहूमध्ये मिसळून ठीक ठिकाणी ठेवलेले आढळले. स्थानिकांच्या तक्रारीवरून 8 दिवसांपूर्वी या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरही पुन्हा अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.
पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण
बेगमपुरा भागात अनेक परिवार दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहे.या व्यवसायिकांची जनावरे याच हिरवळीत चरण्यासाठी जात असतात.आत या ठिकाणी अशा प्रकारे विष प्रयोग सुरू असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभाग, पोलिसांनी घेतली नाही दखल
अनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेले बुद्धीविहारातील भन्ते सत्यदिपजी आणि स्थानिकांनी मेलेल्या मोरांची पिसे आणि जंगलात ठेवलेले विष घेऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती.मात्र अगोदरच जनावर मेल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तपास सुरू आहे असे सांगून नागरिकांना परत पाठविले मोरांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस आणि वन विभागाने दखल घेतली नाही.या गंभीर विषयात लवकरच लक्ष घातले गेले नाही तर बौद्ध लेणी आणि हनुमान टेकडी जंगलातील अनेक मोरांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
4 मोर मेले 3 मारण्याच्या स्थितीत
जंगलामध्ये अनेक जनावरे मारून पडले आहे.त्यांना खाल्ल्याने कुत्रे मृत्यू पावताय.विष खाल्याने चार मोर मरण पावले आहे.तीन मोर मारण्याच्या स्थितीत आहे. मुक्या जनावरांचे जीव घेणार्या नाराधमास पोलिसांनी तातडीने अटक करावी.
- भन्ते सत्यदिपजी, फिर्यादी
हत्येचा गुन्हा दाखल करा
सदोष मनुष्य हत्या केल्यानंतर ज्या प्रमाणे गुन्हा नोंद होतो त्याच प्रमाणे या प्रकरणातही आरोपींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पशू-पक्षी हा नैसर्गिक ठेवा आहे. तो जतन केला पाहिजे. आरोपींना सार्वजनिक ठिकाणी शिक्षा देण्यात यावी.
- दिलीप यार्दी, पक्षी मित्र